ताज्या बातम्या बिंदास राजकारण

शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार सध्या गप्प का?

असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2420 मतांनी निसटता विजय मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेले आव्हान आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित करत सिल्लोड मध्ये केलेला हस्तक्षेप या सगळ्या घटना घडूनही अब्दुल सत्तार यांच्याकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

आक्रमक आणि रोखठोक भूमिकेसाठी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) ओळखले जातात. सिल्लोड सोयगाव मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी सत्तार यांना आशा होती.

मात्र शिवसेनेतील अंतर्गत विरोध आणि भाजपच्या नेत्यांनी सत्तार मंत्री नको, अशी घेतलेली भूमिका यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. एकाच पक्षात असूनही एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय शिरसाट यांची मंत्री पदावर वर्णी लागली आणि आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री ही झाले आहेत.

त्यामुळे अब्दुल सत्तार काहीसे बॅक फुटवर गेल्याचे चित्र आहे. सत्तार मंत्री असताना आणि दोन महिन्याच्या त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे त्यांच्याशी अनेकदा खटके उडाले. एवढेच नाही तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना हाताशी धरून जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र त्यानंतरही संजय शिरसाट विजयी झाले. उलट अब्दुल सत्तार यांचीच विकेट पडता पडता राहिली.

पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी आता अब्दुल सत्तार यांना टार्गेट केल्याचे दिसते. नागरी सत्कार सोहळ्यात ‘माझ्या नादाला लागू नका’, असा निर्वाणीचा इशारा देत संजय शिरसाट यांनी सत्तार यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयावर फुली मारण्याची तयारी सुरू केली आहे. दीड-दोन महिन्याच्या पालकमंत्री पदाच्या कालावधीत अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतलेल्या 508 कोटींच्या कामांपैकी अतिरिक्त कामांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.


या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून अडीचशे कोटींच्या कामाच्या वर्कऑर्डर अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांना डीपीडीसीमध्ये नियोजन करण्यासाठी 31 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मार्च अखेरपर्यंत मंजुरी दिलेल्या कामांमधील कोणती कामे अतिरिक्त ठरवली जातात? कोणती रद्द होतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना महायुतीच्या विरोधकांना कोट्यावधींची कामे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

याशिवाय पालकमंत्री असलेल्या अब्द ल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात 26 कोटींच्या 260 पैकी निम्मी म्हणजे 134 कामे मंजूर केली होती. या सर्व कामांना चार दिवसात जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे समन्यायी कामांचे वाटप न झाल्याचा आरोप महायुतीच्या आमदारांनीच त्यांच्यावर केला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट सत्तार यांच्या मतदारसंघातील किती कामांचे फेरनियोजन करतात? किती रद्द करतात? यावर शिरसाट विरुद्ध सत्तार संघर्ष किती टोकाचा असेल? हे ठरणार आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.