एकरी ११ क्विंटलचा उतारा : शेतकऱ्याची यशोगाथा
सावखेडा गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील एका शेतकऱ्याने २९ एकर शेतात ३२० क्विंटल तुरीचे उत्पादक काढले असून हा परिसरात विक्रम असल्याची चर्चा आहे.

शंकरपूर येथील युवा शेतकरी अभंग शेवाळे व केदार शेवाळे हे प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांना १०० एकर शेती आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ते विविध उत्पादन घेतात आत्तापर्यंत त्यांनी मोसंबी, आले, मका आदींचे चांगले उत्पादन घेतले
असून यापूर्वी सोयाबीन टोकन लागवड करत एक वेगळा प्रयोग प्रथमच केला. मागील ४ वर्षापासून ते तूर शेतीकडे वळले आहेत. यात वाणाची निवड, बीज प्रक्रिया, पेरणीचे अंतर, सूक्ष्म अन्नद्रव्ये, एकात्मिक कीड व्यवस्थापन आदी बाबी अगदी बारकाईने राबविल्या. त्यामुळे २०२२ मध्ये त्यांना एकरी ८ क्विंटल, २०२३ मध्ये एकरी ९ क्विंटल उत्पादन मिळाले. २०२४ च्या खरिपात त्यांनी २९ एकरवर तुरीची लागवड केली.

यात त्यांनी एकरी ११ क्विंटलप्रमाणे एकूण ३२० क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले आहे. यासाठी त्यांना कृषी संशोधन केंद्रातील डॉ. दीपक पाटील, प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. किशोर झाडे, डॉ. तुकाराम मोटे, प्रकाश देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभले.

३५ एकरांवर मोसंबी; १४ एकरांवर आद्रक लागवड
शेतकरी शेवाळे यांनी तुरीव्यक्तिरिक्त ३५ एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड केली असून १४ एकरांवर आद्रकची लागवड केली आहे. तसेच बटाटा ७एकर, चिक्कू ६ एकर, पपईची २ एकरांवर लागवड केली आहे.